"ते जेथून गेले - त्याचेच राजमार्ग झाले...'
चांगले नेतृत्व कसे असावे ह्या प्रश्नाला कुठलेही ठोस उत्तर नाही. वैयक्तिक, सामाजिक, राजकीय, औद्योगिक अशा सर्व स्तरावर अनुत्तरीत राहिलेला हा प्रश्न आहे. मात्र नेतृत्व कसे असावे, कसे शिकावे याबद्दल काही ठोबळ कल्पना आहेत. तज्ज्ञांच्या मते समाजात व उद्योगातही परिस्थितीप्रमाणे नेतृत्वगुणात बदल होतात. एकच नियम सर्वकाळी व सर्व लोकांना लागू होत नाही. जशी परिस्थिती तशी नेत्याला भूमिका घ्यावी लागते. उद्योगाच्या बाबतील बोलायचं तर कामगारांचा उद्धार व ध्येयप्राप्ती हे दोन्ही साध्य करणारे नेतृत्व आदर्श समजले जाते. हे दिसते तितके सोपे नाही आणि म्हणून लोकांच्या प्रेरणाना चेतवत, आकांक्षांना फुलवत, अप्तांना खुणावत असे लोक ध्येयाकडे त्यांना नकळत घेऊन जातात. हे ध्येय उद्योग चालवणे, नफा मिळवणे इतकेच मर्यादित न ठेवता अधिक व्यापक, प्रगल्भ ठेवण्यात असे उद्योजक यशस्वी होतात.
आधुनिक उद्योगजगतात अनेकानेक व्यक्तिंनी आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला. त्यांच्या नावानेच ते प्रयोग, उद्योग झाले आणि नंतर त्यांच्या हयातीतही दंतकथांपेक्षा अधिक सुरस ठरले. नेतृत्व कसे असावे यावर थिअरी खूप झाल्या. पण नेते त्या थिअरी पाठ करून कधीच वागत नाहीत "श्रीराम धर्म शिकून पाळत नव्हता.' त्याने जे केले तोच नंतर धर्माच्या चिंतकानी शब्दबध्द केले असे म्हणतात ते या अर्थाने. किर्लोस्करांनी ओसाड माळरानावर समाजाने टाकलेल्या "कंटकाना' घेऊन उद्योगाची शिखरे रचली तर बाबा आमटेंनी बोटं झडलेल्या जीवांना "भीक नको श्रमाचा मोबदला द्या' असे शिकवत आनंदाची प्रतिसृष्टी उभी केली. वर्गीस कुरीयननी गावोगावच्या दुधाचे "मंथन' करून त्यातून "अमूल'चे लोणी आणले तर हॉटेलमध्ये प्रवेश न मिळालेल्या टाटांनी सर्वोत्तम हॉटेलची साखळी तर केलीच पण "विज्ञान व तंत्रज्ञान भारताच्या अभ्युदयासाठी वापर'हा विवेकानंदाचा मंत्र मिळताच परदेशातील विलासाचे स्वप्न सोडत भारताच्या उद्योगजगतात एकामागून एक विकासवृक्ष फुलवले. अशी कितीतरी उदाहरणे देता येतील. अलीकडेच एका जेष्ठ राजकीय नेत्याने आणीबाणीचे दिवस आठवत तसे पुन्हा होऊ शकेल असे सूचक विधान केले आणि प्रसारमाध्यमांच्या हातात आयते कोलीत मिळाले इंदीरा गांधी ते मोदी व्हाया राजीव, आटलजी, नरसिंहराव इ. आणि अगदी आत्ताचे मनमोहन सिंग यंच्या रूपाने भारताने नेतृत्त्वाचे अनेक आयाम अनुभवले सोसले सुद्धा पण चांगले नेतृत्व कसे असावे हा वैयक्तिक, सामाजिक, राजकीय औद्योगिक अशा सर्व स्तरावर अनुत्तरीत राहिलेला प्रश्न आहे. अभिनेता नेता झालेला व नेता कसलेला अभिनेता झालेला रेगनपासून अम्मापर्यंत जगाने पाहिला. नेता हा संघटक, आयोजक व व्यवस्थापक यांच्यापेक्षा फार वेगळा असतो विराळा असतो. काहीकाळापुरते पैसा, प्रसिद्धी व प्रचार याने लोकप्रिय व वलयांकित झालेले नेते अमाप लोकाश्रयामूळे "देव' होतात. त्यांच्या पूजा होतात. पण जनतेच्या अपेक्षा व प्रतिमेपुढे त्यांचा चुरडा झालेला अनेकदा पहायला मिळतो. अमेरिकेचा अध्यक्ष असो की IMF (International Monitory Fund)चा प्रमुख जनता नेत्याकडून नैतिकतेच्या काही "अबोल व अपेक्षित' कल्पना ठेवते. त्याला तडा गेला तर तीच जनता आपल्या देवाला पायाखाली तुडवते. हे सत्य पिंजरा, दिवार आणि त्याच्या अनेक झेरॉक्स कॉपी (उदा. अग्निपथ) पासून ते मुसोलिनी असो वा "बापू' सर्वांना लागू होते. त्याला मल्ल्या, सहारा री व "सत्यम' राजू अपवाद होऊ शकत नाही. लाखो जीवांच्या अपेक्षा व विश्वास अहोरात्र उराशी बाळगूनही शून्यातून स्वराज्य निर्माण करून दिल्लीच्या तख्ताला आव्हान देऊनही कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेला परत पाठवणारा आणि आपली सारी दौलत व सत्ता एका संन्याशाच्या झोळीत टाकणारा शिवाजी युगायुगातून एखादा होतो. व्हिएतनामसारख्या दूरस्थ देशाच्या अध्यक्षानाही प्रेरणा देऊ शकतो. "राजा म्हणजे जगाचा उपभोगशून्य स्वामी' हे राजसंन्यासमधे गडकर्यांनी लिहिले ते या अर्थाने. नेता हा सर्व करूनही पुन्हा अलिप्त राहू शकतो. त्याच्या उद्योग हीच त्याची साधना असते. त्याचा योग असतो मात्सुशीताच्यां विचाराप्रमाणे तो उद्योग करतो तो केवळ सर्वसामान्यांना शांती आणि संमृद्धी लाभावी यासाठी.
नेतृत्व कसे असावे, कसे शिकावे याबद्दल काही ठोबळ कल्पना आहेत. हुकुमशाही, लोकशाही व अराजक अशा तीन प्रकारात नेते मोडतात. समाजात व उद्योगातही ब्लांचार्डच्या मते परिस्थितीप्रमाणे नेतृत्व हा अधिक योग्य मार्ग आहे. एकच नियम सर्वकाळी व सर्व लोकांना लागू होत नाही. जशी परिस्थिती तशी नेत्याला भूमिका घ्यावी लागते. तुम्ही कीतीजणांचे नेतृत्व करता व त्यांची बौद्धीक, शैक्षणीक इ. पातळी काय आहे यावरही नेतृत्वाचे उपायोजन ठरते. म्हणजे जर तुमची टीम लहान पण स्वयंप्रेरित व हुशार असेल तर ते अगदी फार नेतृत्व न करताही चांगले काम करतात. उलट त्यांच्या कामात हस्तक्षेप करणं त्यांना डीमोटीवेट करतं. याउलट जे केवळ भितीने व अन्नपाणी या प्रेरणेने काम करतात त्यांना लालूच आणि भिती या न्यायानेच कामाल लावता येते. म्हणून योग्य नेत्तत्व कसे असावे हे तुमच्या टीमच्या प्रेरणा काय आहेत ते का काम करतात वर अवलंबून आहे. खालील तक्त्यात पुन्हा दिसेल.
1. लोकांची (तुमचे कामगार/टिम/तसेच ग्राहक) पर्वा, ममत्व कमी, ध्येयप्राप्तीची इच्छा नाही. हे नेतृत्व म्हणजे कंन्ट्री क्लब सारखे किंवा स्कॅमस्टर सारखे किंवा सेकंड जनरेशन ऑफ इंडस्ट्रीअल यूनिट सारखे!! (काही अपवाद आहेत).
2. ध्येय प्रप्तीची जबरदस्त ईच्छा पण लोकांची (तुमचे कामगार/टिम/तसेच ग्राहक) पर्वा नाही. हे नेतृत्व म्हणजे टास्क मास्टर – हुकुमशाह नाही तरी जवळजवळ तसेच एमएनसी, एसएसआय, आटी मध्ये बघायला मिळते.
3. लोकांचा प्रचंड कैवार पण ध्येयाबाबत गोंधळ किंवा अनास्था. हे नेतृत्व मनाने चांगले पण उद्दीष्टपूर्तीत कमी पडणारे. एकवेळ एनजीओ साठी योग्य कारण असेही त्यांचे ध्येय अफाट असते.
4. लोकांचा उद्धार व ध्येयप्राप्ती दोन्ही साध्य करणारे हे खरे नेतृत्व – हे दिसते तितके सोपे नाही आणि म्हणून लोकांच्या प्रेरणाना चेतवत, आकांशाना फुलवत, अप्तांना खुणावत असे लोक ध्येयाकडे त्यांना नकळत घेऊन जातात. हे ध्येय उद्योग चालवणे, नफा मिळवणे इतकेच मर्यादित न ठेवता आधीक व्यापक, जिवंत करण्यात त्यांना यश मिळते. "1 Lakh Car', "A mobile for all', "Ecotel', "Made in Japan', "Make in India' अशाचकाही नेत्यांनी 4 क्रमांकाच्या नेत्यांनी मांडलेल्या कल्पना आहेत त्याचेच रुपांतर यशस्वी उद्योगात, यशस्वी राष्ट्रनिर्मितत झाले - होणार आहे. - होत राहील यात शंका कसली!
युएन ने मान्य केलेला २१ जून हा "जागतिक योग दिन' असावा ही कल्पना अशाच प्रेरक नेतृत्व ज्याचे नावही आपल्याला माहित नसेल त्याने मांडलेली व यशस्वीपणे अंमलात आणलेली कल्पका आहे.
उत्तम नेतृत्व करणारा योगीच असतो त्यात शंका नाही. योगेश्वर श्रीकृष्णानी अनेक श्लोकात नेतृत्वाचे अगदी ब्लांचार्डच्या परिस्थितीप्रमाणे नेतृत्वाचे उल्लेख केले आहेत. ते सविस्तर पाहता येईल.