बँक ऑफ बडोदा, विजया बँक आणि देना या बँकांचे विलीनीकरण
सार्वजनिक क्षेत्रातील बँक ऑफ बडोदा, विजया बँक आणि देना या बँकांचे विलीनीकरण डिसेंबरच्या अखेरपर्यंत होण्याचे सूतोवाच गेल्या महिन्यात करण्यात आले होते. केंद्रीय मंत्रिमंडळाने तिन्ही बँकांच्या एकत्रीकरणाला मंजुरी दिली. या मंजुरीमुळे देशातील तिसऱ्या क्रमांकाची बँक अस्तित्वात येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या विलीनीकरणाचा परिणाम तिन्ही बँकांच्या ताळेबंदावर तसेच ग्राहकांवरही पडण्याची शक्यता आहे. जर, ग्राहकाचे खाते या तिन्हीपैकी एका बँकेत असेल तर, त्यांना कोणत्या बदलांचा सामना करावा लागतो, खाते क्रमांक बदलणार तीन बँकांच्या विलीनीकरणामुळे ग्राहकांना नवे खाते क्रमांक आणि कस्टमर आयडी मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुमचा ई-मेल, मोबाइल क्रमांक बँकेकडे अपडेटेड करावा लागेल. त्यामुळे बँकेच्या नियमांत झालेल्या बदलांची माहिती मिळण्यास सोयीची जाईल. तिन्ही बँकांच्या विलीनीकरणानंतर सर्वप्रकारच्या इलेक्ट्रॉनिक क्लिअरिंग सर्व्हिस (ईसीएस) आणि पोस्ट डेटेड चेक क्लिअर करण्याची आवश्यकता भासणार आहे. त्यामुळे संबंधित ग्राहकांनी आपली बँक, फंड हाउस आणि इन्शुरन्स कंपनीशी संपर्क करून नव्याने 'ईसीएस' जारी करण्याची काळजी घेण्याची आवश्यकता आहे. ऑटो डेबिट किंवा 'सिस्टीमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन'साठी ग्राहकांना नव्या एसआयपी नोंदणीचा अर्ज भरावा लागण्याची शक्यता आहे. अशाच प्रकारची प्रक्रिया कर्जांच्या ईएमआयसाठीही करावी लागण्याची शक्यता आहे. विलीनाकरणामुळे तिन्ही बँकांच्या काही शाखा बंद होण्याची शक्यता असून, ग्राहकांना नव्या शाखांमध्ये जाण्याची आवश्यकता भासणार आहे. उदा.तुमच्या सध्याच्या बँकेच्या शाखेजवळ जर बँक ऑफ बडोदाची शाखा असेल तर तुमची शाखा बंद होण्याची शक्यता आहे. ज्या दिवशी बँक ऑफ बडोदाकडून दोन्ही बँकांचे अधिग्रहण केले जाईल, त्या दिवशी जाहीर करण्यात येणारा मुदतठेवीचा दर लागू होणार आहे. मात्र, सध्याच्या मुदतठेवींवर मुदतपूर्ण होईपर्यंत व्याज मिळणारच आहे. त्याचप्रमाणे कर्जांवरील व्याजही पूर्वीच्याच करारानुसार आकारण्यात येईल. याशिवाय गृहकर्जावरील सध्याचे व्याजदर आहे तसेच, राहणार आहेत. सर्वप्रकारच्या व्याजदरात नवी बँक जोपर्यंत बदल करणार नाही, तोपर्यंत कोणत्याही प्रकारचा बदल होणार नाही.