संपादकीय
हा लेख वाचकांच्या हातात पडेल तेव्हा २०१६ साल जवळ जवळ संपले असेल. कसे होते हे वर्ष ? उद्योगजगत २०१६ वर्षाबाबत समाधानी आहे का ? २०१७ हे नवीन वर्ष कसे असेल ?
प्रथमतः आपण हे लक्षात घेतले पाहिजे की ह्या वर्षी पाऊस चांगला झाला. गेल्या २/३ वर्षांपासून दुष्काळाचे सावट राज्यावर होते. त्यामुळे ह्या वर्षीच्या मुबलक पावसामुळे केवळ बळीराजाच नव्हे तर समाजातील सर्वच घटकांकडे थोडा बहुत पैसा खेळायला लागला. सहाजिकच बाजारपेठेत खरेदी विक्री थोडी जास्त झाली. म्हणजेच २०१६ साल हे २०१५ पेक्षा तुलनेने बरे गेले असे म्हणायला हरकत नाही. बाकी ह्या वर्षात विशेष काही घडले नसले तरी वाईटसुद्धा न घडल्यामुळे उद्योग जगतातील व बाजार पेठेतील वातावरण चांगले राहिले.
आंतरराष्ट्रीय स्तरावर मात्र उद्योग जगताची परिस्थिती वाईटच आहे असे म्हणावे लागेल. मध्य पूर्वेतील युद्धसदृश परिस्थिती, तळाला गेलेल्या तेल किमती, brexit चे संभाव्य परिणाम, ह्या सर्व गोष्टींमुळे उद्योग जगताचा मूड फारसा सकारात्मक राहिला नाही. पण ह्या मुळे एक झाले, भारत हा एकमेव असा देश आहे की ज्याची अर्थव्यवस्था वाढती आहे व आज ना उद्या वेगाच्या बाबतीत ती चीन ला मागे टाकू शकेल, ही गोष्ट जागतिक स्तरावर परत एकदा ठसली व त्याचा परिणाम हळूहळू दिसू लागला आहे. परदेशी गुंतवणूक वाढत आहे, देशातील परदेशी चलनाची गंगाजळी वाढत आहे. ह्या दृष्टीने २०१७ हे वर्ष २०१६ पेक्षा अधिक चांगले जाईल अशी आशा करायला काहीच हरकत नाही. मात्र नोटाबंदीच्या निर्णयाने सध्या व नजीकच्या भविष्यात उद्योग जगतावर परिणाम नक्की होणार आहे. काही तज्ज्ञांच्या मते GDP वाढण्याचा दरसुद्धा कमी होऊ शकतो. हे एक नवीनच आव्हान भारतीय अर्थव्यवस्थेपुढे आले आहे. परंतु आज तरी आपण आशा करू शकतो की आपली अर्थव्यवस्था व संपूर्ण देश हे आव्हान पेलू शकेल व त्यातून अधिक मजबूतपणे बाहेर पडेल !
२०१७ हे वर्ष आपणा सर्वांना समृद्धीचे व भरभराटीचे जावो ही सदिच्छा!