राज्यात १२ लाख १० हजार ४६४ कोटींची गुंतवणूक
मँग्नेटीक महाराष्ट्र कॉर्न्व्हजन्स २०१८ समेटच्या समारोपात मुख्यमंत्र्यांची माहिती
मँग्नेटीकमहाराष्ट्रच्या माध्यमातून राज्यात १२ लाख १० हजार ४६४ कोटी रुपये गुंतवणुकीचे ४ हजार १०६ सामंजस्य करार झाले आहेत. त्या माध्यमातून ३६ लाख ७७ हजार १८५ जणांना रोजगार उपलब्ध होणार आहे. राज्याच्या अविकसित भागात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक होणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
यावेळी रिलायन्स उद्योग समूहाबरोबर ६० हजार कोटी रुपये गुंतवणुकीच्या तसेच राज्य शासन व भारतीय रेल्वे यांच्या समवेत सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. ‘सहभाग’ या वेबपोर्टलचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले.
त्यांच्या मतेमॅग्नेटिकमहाराष्ट्रला प्रचंड यश मिळाले आहे. राज्याच्या अविकसित भागात मोठ्या प्रमाणावर औद्योगिक गुंतवणूक झाली आहे. त्याचा फायदा मराठवाड्याला मोठ्या प्रमाणावर होणार आहे. मॅग्नेटिकमहाराष्ट्रच्यायशस्वीतेविषयी मुख्यमंत्री म्हणाले की, एकूण ४ हजार १०६ सामंजस्य करार झाले असून सर्वात जास्त गुंतवणूक उद्योग क्षेत्रात ५ लाख ४८ हजार १६६ कोटी एवढी होणार आहे. तर गृहनिर्माण क्षेत्रात ३ लाख ८५ हजार तर ऊर्जा क्षेत्रात १ लाख ६० हजार २६८ कोटी गुंतवणूक होणार आहे. राज्य शासनाने महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या माध्यमातून संरक्षण आणि हवाई उद्योगासाठी १ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार आहे.
आज रेल्वेसोबत झालेल्या ६०० कोटी रुपयांच्या सामंजस्य करारामुळे लातूर येथे सुमारे ३५० एकर जागेवर रेल्वे कोच निर्मिती कारखाना पहिल्या टप्प्यात सुरू करण्यात येणार आहे. यामुळे या भागात १५ हजार जणांना थेट रोजगार मिळणार आहे. तर त्याच्या तिप्पट अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती होईल. हा प्रकल्प एकूण २ हजार हेक्टर जागेवर तयार करण्यात येत आहे. तेथे मेट्रो कोच निर्मिती होणार आहे. मेट्रोचे हे डब्बे देशाबरोबरच जागतिक स्तरावर देखील पाठविण्यात येतील. या प्रकल्पामुळे लातूर, बीड, उस्मानाबाद, या जिल्ह्यांचे भाग्य उजळणार आहे. मराठवाडा भागात गेल्या अनेक वर्षात कुठलाही मोठा प्रकल्प आला नव्हता. रेल्वे सोबत झालेल्या सामंजस्य करारामुळे या भागात मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिताला चालना मिळणार आहे.
राज्याच्या गडचिरोली, हिंगोली, नांदेड, परभणी, नंदूरबार यासारख्या औद्योगिक दृष्ट्या अविकसित भागात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक होणार आहे. नव्याने सुरू करण्यात आलेल्या ‘सहभाग’ वेबपोर्टलच्या माध्यमातून सामाजिक उत्तरदायित्व निधीचा (सीएसआर) वापर सामाजिक विकासासाठी करण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
दोन वर्षापूर्वी झालेल्या मेक इन इंडिया सप्ताहात आठ लाख कोटी रुपयांचे सामंजस्य करार झाले होते. त्यापैकी दोन वर्षात ६१ टक्के सामंजस्य करार प्रत्यक्षात कार्यरत झाले. यामुळे युवकांना मोठ्या प्रमाणावर रोजगार मिळणार आहे.