‘स्मार्टफोन’मध्ये भारत दुसऱ्या स्थानी
स्मार्टफोनधारकांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर भारताने अमेरिकेला मागे टाकून जगातील दुसऱ्या क्रमांकाच्या, सर्वांत मोठ्या स्मार्टफोन बाजारपेठेचा मान पटकावला आहे. स्मार्टफोन बाजारपेठेत चीनने यंदाही अव्वल स्थान कायम राखले आहे.
स्वस्त हँडसेटच्या विक्रीत झालेली वाढ आणि ‘फोरजी’ तंत्रज्ञान या दोन प्रमुख कारणांमुळे देशातील स्मार्टफोन बाजारात मोठी वाढ नोंदवण्यात आली आहे. चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीमध्ये स्मार्टफोनमधील विक्रीत अंशतः घट झाल्यानंतर बाजारात पुन्हा तेजी परतली आहे. तिसऱ्या तिमाहीत मात्र, स्मार्टफोनच्या विक्रीमध्ये २३ टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली आहे. ‘कॅनालिस रिसर्च’च्या मते तिसऱ्या तिमाहीत एकूण चार कोटी हँडसेटची विक्री झाली आहे.